अमळनेर प्रतिनिधी:
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची जिल्हा आढावा बैठक काल, २४ जानेवारी रोजी अमळनेर येथे पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन आणि निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या पक्षांशी युतीची तयारी
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेच्या समविचारी पक्षांसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र, तसे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज आहे.”
राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिका आणि महानगर पालिकांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशाचा उल्लेख करत, आता ग्रामीण भागातही पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र सोनवणे यांनी ‘गाव तेथे शाखा’ हे सूत्र मांडले असून, पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावात संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा युवा अध्यक्ष जितुभाऊ केदार यांनी युवकांना मोठ्या संख्येने पक्षात सामील होण्याचे आवाहन केले, जेणेकरून निवडणुकीत तरुण रक्ताचा फायदा होईल.
ध्येय-धोरणांचा प्रचार: जिल्हा महासचिव प्रा. प्रीतीलाल पवार यांनी पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचवले.
यावेळी जिल्हा महानगर उपाध्यक्ष विकासभाऊ भालेराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे यांनी केले.
या बैठकीस पोपट अप्पा निकम, दिपक सैदाणे, भीमराव वानखेडे, किशोर सोनवणे, अरुण पवार, मोहन बैसाणे, जब्बार शाह, प्रविण पाटील, संजय यादव, गोकुळ मगळे, वामन घोलप, समाधान शिरसाठ, रोहित अहिरे, पूनमचंद निकम, शिवदास कोळी, तुकाराम माळी, अशोक साळूंखे, सखाराम बैसाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
